येरे येरे पावसा…

शाळेमध्ये असताना “आवडता ऋतू” वर निबंध लिहायला सांगत. मला नेहमीच हिवाळा आवडायचा. पण त्यावर काही विशेष लिहायला नसायचं.. किंव्हा असं म्हणावं की सुचायचं नाही. मग मन मारून “माझा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा..” या ठराविक ओळीने सुरुवात करायचो. तसं पावसाळा आणि माझ्यात असं काही विशेष वैर नाही, पण नाही असही नाही.

उन्हाळ्याची सुट्टी मिळाल्यानंतर, क्रिकेट खेळण्याचा ज्वर चढतो. आणि मध्येच पावसामुळे सर्व बंद. घरून तंबी मिळते, बाहेर जायचे नाही, बाहेरचे काही खायचे नाही.. पाऊस म्हणलं की चिख्खल, चिकचिक, सर्दी इत्यादी इत्यादी. आणि सर्वात महत्वाच म्हणजे शाळा आणि पाऊस दोन्ही जवळपास सोबतच हजेरी लावतात. मग कशाला वाटणार पावसाबद्दल प्रेम? वरून पाऊस आला तरी शाळेला सुट्टी नसायची.. गपचूप भिजत शाळेत जायचं. या उलट हिवाळा म्हणजे एकदम सही.. सणासुदीचे दिवस, दिवाळीच्या सुट्ट्या, क्रिकेट, पतंग, काय वाट्टेल ते खेळायचं. एकूण काय तर हिवाळा जाम आवडायचा आणि पावसाळ्याचा नकोसा वाटायचा.

काल पाऊस सुरु झाला. कडक चहा हातात घेऊन खिडकीजवळ उभा होतो, पावसाला बघत. थंड हवेच्या झुळूकेसोबत पाण्याचे थेंब आतमध्ये येत होते, मोठे मोठे टपोरे नाही तर धुक्यासारखे. चिंब भिजवणारे नाही तर ओलावा देणारे. इकडे रेडिओ कोणततरी गाणं गुणगुणत होता. अर्थातच मन भूतकाळात पळणार. पावसाशी जोडलेल्या सगळ्या आठवणींची ट्रेन सुरु झाली. टपरीवर भिजत घेतलेला चहा असेल, प्रचंड भूक लागली असताना गरम गरम घेतलेले भजे असतील, मित्रांसोबत एकामागून एक सटकून पडलेला क्षण असेल,  “कोणाच्या” आठवणी असतील, एखादा गड सर केल्यानंतर दिसणारा विहंगम दृश्य असेल, किती तरी आठवणी दिल्या आहे या पावसाने आपल्याला.

पाऊस संपल्यानंतर सगळं कसं झ्याक वाटतं. धुराने आणि धुळीने माखलेल्या झाडांना पॉवरवॉश मिळतो आणि आपल्याला नवीन रंग दिसू लागतात. मळभ दूर होते.. निसर्गाची आणि मनाची सुद्धा.  समुद्र किनारी रेघोट्या मारल्यानंतर एक लाट येते आणि सर्व काही मिटून जातंना तशी संधी दरवर्षी पाऊस आपल्याला देतो. की बाबारे, ही घे मागच्या वर्षीची क्लीन-चीट, नव्याने सुरु कर आता.

ह्या सगळ्या गोष्टी पावसाने मला दिल्या आणि मी काय दिला पावसाळ्याला; तिरस्कार. म्हणूनच काय ते, पाऊस पण सध्या अधून मधून रागावतो, एक दोन वेळेस भराभरा बोलून नंतर अबोला धरतो. पुण्याला आहे तसा पाऊस पण माझा मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. वाटलं, लहानपणीची केलेली वरवरची स्तुती त्याला समजली असणार.. म्हणूनच गप्प बसला आहे. त्या क्षणी ठरवलं, किमान मनापासून लिहिलेले दोन शब्द तरी पावसाला ऐकवावेत. म्हणून हा छोटासा लेख.

“येरे येरे पावसा…” तुझी खरच खूप आतुरतेने वाट बघत आहे बळीराजा..

Published by

One thought on “येरे येरे पावसा…”

Leave a comment